शासकीय योजना अधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मदत घेणार – मुख्यमंत्री
शनिवार, २० ऑगस्ट, २०११
शासकीय योजना अधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मदत घेणार - मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि ई-गव्हर्नन्स आदी उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. यापुढे विविध विभागांच्या योजना अधिक पारदर्शकपणे आणि सुव्यवस्थितपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य ज्ञान महामंडळाची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महामंडळाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात बोलताना जाहीर केले.
एमकेसीएलचा दशकपूर्ती समारंभ शनिवारी मुंबईतील नेहरु तारांगण येथे आयोजित करण्यात आला होता. उप मुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, एमकेसीएलचे सर्व भागधारक, सदस्य, विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशात संगणक क्रांतीचा शुभारंभ करणाऱ्या स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी स्थापन करण्यात आलेल्या एमकेसीएलने दहा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खूपच चांगले काम केले आहे, अशी प्रशंसा करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, तुटपुंज्या भांडवलावर सुरु झालेल्या या कंपनीने मिळालेल्या संधीचे सोने केले. माहिती व तंत्रज्ञानाच्या बळावरच भारत महासत्ता बनू शकणार आहे. त्यासाठी आपल्याला संगणक आणि अंकीय शास्त्राच्या ज्ञानाचा जास्तीतजास्त प्रसार करणे गरजेचे आहे. एमकेसीएल नेमके हेच काम करीत आहे.
हार्डवेअर क्षेत्रात प्रचंड क्रांती होत आहे. अशावेळी वेगवेगळ्या यंत्राचा शोध लावणारे शास्त्रज्ञ देशात निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी आणि भाषिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
दहा वर्षात ६० लाखांपेक्षा जास्त लोकांना संगणक साक्षर केल्याबद्दल एमकेसीएलच्या सर्व संबंधितांचे अभिनंदन करुन उप मुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, फायद्यात सुरु असणारे शासनाचे हे एकमेव महामंडळ असावे. आज असे एकही क्षेत्र नाही की, ज्यात संगणकाचा उपयोग केला जात नाही. जागतिक स्पर्धेच्या युगात संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान ही महत्वाची शस्त्रे आहेत. संगणक ही आज गरजेची वस्तू बनली आहे. संगणक साक्षरता नसलेल्या व्यक्तीला यापुढे निरक्षर समजले जाऊ लागले आहे. यामुळेच एमकेसीएलच्या कार्याचे महत्व अधिक जाणवू लागले आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, ओरिसा आणि परदेशात सिंगापूर, सौदी अरेबिया, घाना आदि देशात एमकेसीएलनी संगणक साक्षरतेचे अभ्यासक्रम सुरु करुन या क्षेत्रातील आपले स्थान पक्के केले आहे. डिजीटल स्कुलच्या प्रकल्पाला मिळालेल्या ई-इंडिया पुरस्कारामुळे एमकेसीएलच्या अभ्यासक्रमांचा दर्जा किती उच्च प्रतीचा आहे याची कल्पना येते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले की, नफा कमवणे हा एमकेसीएलचा उद्देश नसला तरी एमकेसीएलने आत्तापर्यंत शंभर कोटी रुपयांच्या वर रक्कम राज्य सरकारला दिली आहे. एमकेसीएलनी आत्तापर्यंत पाच हजार केंद्रांच्या माध्यमातून एक लाख युवकांना रोजगार व उपजिवीकेच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे ही एमकेसीएलची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. यापुढील दहा वर्षांत एमकेसीएल अधिक प्रभावीपणे काम करेल आणि ज्ञानाधिष्ठीत व तंत्रज्ञानाने जोडलेला समाज निर्माण करेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री श्री. सावंत यांनी एम.के.सी.एल.च्या सहकार्याने ओरिसा नॉलेज कॉर्पोरेशन लि.ची स्थापना होणार असल्याची घोषणा यावेळी केली. यासंबंधातील अभिवचन पत्र श्री.प्रवीण कुमार राऊत यांना मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमास एम.के.सी.एल.च्या ऑलिम्पियाड उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. एम.एस.सी.आय.टी.परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या अकरा भाषांतील सी.डी. चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. एम.एस.सी.आय.टी. च्या अभ्यासक्रमाचे मूळ पुस्तक लिहिणारे टिमॉथ ओलियरी यावेळी उपस्थित होते.
MAHA NEWS LINK:
http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=dxylO/DAJzYmUadaNE1MexOI9kvUXM2Y5ZKfSD5tulnoHikoACfdtQ==#
18.535378
73.829815